अपयशातलं समाधान .......................
अपयशातलं समाधान वरील हे शीर्षक वाचून थोडसं गोंधळलात ना ?? काही चुकीचे वाचलंय , का शब्दांची अदलाबदल झाली ? असे विचार तुमच्या मनात येणं अगदी स्वाभाविक आहे. कारण मुळात अपयश आणि समाधान हे तसे परस्पर विरोधी शब्दच. आपण बघतो की अपयश असलं तर नेहमी त्यात दुःख आणि निराशा असते त्यात अपयश हे समाधान शब्दासोबत वाचायला थोडं विचित्र वाटलं असेल . या शब्दातच खूप विरोधाभास आहे .पण हो मी म्हणतोय की अपयशातलं समाधान..........
ज्याप्रमाणे सुखः आणि दुःख म्हणजे नक्की काय , ते कसं आणि कशामुळे मिळतं ह्या बद्दल प्रत्येकाचं एक वेगळं मत आहे, तसंच यश-अपयश या बद्द्दल सुद्धा नक्कीच असू शकतं. आणि ते मत आपण कोणावरही लादू शकत नाही. ज्याला - त्याला याचं स्वातंत्र्य नक्कीच आहे. काहींना त्यांचा आवडता पदार्थ खायला मिळाला तर त्यांना आनंद होतो काही तर काहींना एखादी महागडी वस्तू घेतली तर आनंद होतो, काहींना कोणाकडून काहीतरी भेट मिळाल्यावर आनंद होतो, तर काही लोकांना कोणाला काही दिल्यानंतर, मदत केल्यानंतर आनंद मिळतो . ह्या बाबतीत आपल्या आई आणि वडिलांपेक्षा उत्तम उदाहरण असूच शकत नाही. आई - वडिलांना त्यांच्या मुलांच्या आनंदातच त्यांचा आनंद असतो आणि जर मुलांना काही त्रास झाला तर त्यांनाही त्रास होतो. आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगतोय, समाधान भॊगतोय ते आज किती तरी लोकांनी सोसलेल्या यातनांमुळे , दुःखामुळे , दिलेल्या बलिदानामुळेच ना !!!! त्या प्रयत्नांत त्यांना सुद्धा अपयश मिळत होतं पण तरीही त्यांनी ते अपयश पचवून त्यांचे प्रयत्न सुरु ठेवले आली देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्यांना माहित होतं की मिळालेलं हे स्वातंत्र्य ते बघण्यासाठी, ते अनुभवण्यासाठी आपण जीवंत नसू पण तरीही त्यांनी त्या वेदना त्यावेळी सहन केल्यात , आयुष्य पणाला लावलं . ( हा विषय थोड्या विस्तृत स्वरूपात मी माझ्या आधीच्या " देश आणि मी " या लेखात प्रस्तुत केला आहे. http://sunitkulkarni.blogspot.com/2020/01/blog-post.html)
अपयश म्हणजे काय जिथे यश मिळत नाही ते . अपयश परीक्षेतलं , नोकरीतलं , व्यवहारातलं , नात्यातलं आणि काहींसाठी ते अगदी आयुष्यातलं सुद्धा असू शकतं . अपयश आल्यावर वाईट वाटणं , दुःख होणं हे खूप स्वाभाविक आहे. आपण माणसं आहोत आणि आपल्याला असलेल्या भावना ह्या आपण व्यक्त करतो. जेव्हा खरंच मनापासून आपण प्रयत्न केले तरीही यश मिळालं नाही तेव्हा यश ही अपयशाची पहिली पायरी आहे इ ... हे सुविचार फक्त स्वच्छ अक्षरात शाळेतल्या फळ्यावरच चांगले वाटतात. पण याच अपयशाकडे जर आपण चांगलं दृष्टिकोनातून बघितलं तर त्यात कुठेतरी आपण एक समाधान मानू शकतो . कदाचित माझं हे विधान थोडं धाडसी वाटेल. ते असं की यश मिळालं नाही पण निदान ते जे काही लक्ष्य / साध्य करायचं होतें , ते मिळवण्यासाठी आपण प्रयत्न तरी केलेत . जे प्रयत्न केले त्या प्रयत्नांसाठी समाधान मानायचं जेणेकरून आपल्याला पुन्हा नव्याने उभारी घेता येईल म्हणूनच अपयशातलं समाधान असं मी म्हणतोय .
आपल्या संतांनी सुद्धा समाधान याबद्दल बरंच काही विवेचन केलेलं आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात ठेविले अनंते तैसेचि रहावे । चित्ती असो द्यावे समाधान ।। समर्थ श्री.रामदास स्वामींनी खूप छान म्हंटलेलं आहे ।। जगी सर्व सुखी असा कोण आहे विचार मना तुची शोधूनी पाहे ।। तर जसं म्हटलं की सुखात सुखदुःखाची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी असते. हे अगदीच स्वाभाविक आहे की ज्यावेळेस माणूस हा दुःखी होतो , त्याच्यावर एखादा प्रसंग येतो तर तेव्हा प्रत्येक माणसाला वाटतं की आपल्यावर जो प्रसंग ओढावलाय हे संकट जगात सगळ्यात मोठं आहे. जर अशा परिस्थितीत आपल्याला धर्याने जर पुन्हा उभं राहायचं असेल तर काही अशा वेळेला थोडं आजूबाजूला असणारी परिस्थिती पण बघणं गरजेचं आहे की निदान आजूबाजूच्या लोकांचे दुःख, त्यांच्या अडचणी , त्यांच्यावर आलेले प्रसंग आणि ह्या सगळयांत कुठे ही न डगमगता खंबीर पणाने उभं राहून आलेल्या परिस्थितीचा सामना करण्याचा त्यांचा संघर्ष बघून आपल्याला थोडासा धीर मिळतो , आणि कदाचित त्यांचं दुःख बघून , त्यांची ती परिस्थितीवर मात करण्याचा संघर्ष बघून आपल्याला आपले दुःख थोडं कमी वाटतं आणि आपल्याला दुःख किंवा जे काही यश अपयश आहे ते पचवण्याची आणि त्याचा सामना करण्याची प्रेरणा मिळते म्हणून आलेल्या दुःखाला कवटाळत बसण्यापेक्षा थोडसं आजूबाजूला बघणं गरजेचं वाटतं . तसं ह्या बाबतीत उदाहरण दयायला मला थोडं कठीण जातंय पण मी प्रयत्न करतो . एका माणसा समोर जेवणाचं ताट विविध पदार्थानी भरलेलं आहे पण त्यात त्याला काही पदार्थ आवडत नाहीत म्ह्णून तो आनंदी नाही आणि तेच एका माणसाला खूप दिवसांनी २-३ पदार्थानी ताट भरून दिलं तेव्हा तो जे मिळालं आहे त्यात खूप समाधानी आहे .
आयुष्यात शास्त्र शुद्ध पद्धतीने जर काही साध्य करायचं असेल तर माणसाच्या अंगी धैर्य , अहिंसा , संतोष , समता , तप , दान यश आणि अपयश ह्या बद्दल श्री भगवत गीतेत उल्लेख केलेला आहे . यश आणि अपयश ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत . जसं की एखाद्या स्पर्धेचा अंतिम सामना . ज्यात २ संघ पहिल्या फेरी पासून तर ह्या अंतिम सामना पर्यंत खूप संघर्ष करून पोहोचलेले आहेत . सामना जिकंण्यासाठी साठी दोन्ही संघ त्यांचे सर्वोत्तम प्रयत्न पणाला लावतात पण सामान्यात मात्र १ च संघाला विजयी ठरवता येतं . विजयी संघ हा त्या सामन्यात थोडा सरस ठरला आणि विजयी झाला , यात जो संघ पराभूत झाला तो कमकुवत होता असं नाही. माझ्या मते यश आणि अपयश ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोघांचंही तितकंच महत्व आहे .जसं एखादया चलनी नाण्याच्या दोन्ही बाजू असतात म्हणून त्या नाण्याला आर्थिक व्यवहारांत महत्व असतं अगदी तसंच .
एका वर्गात जर किमान ५० मुलं शिकत असतील तर परीक्षेत सगळ्यांनाच सारखेच गुण मिळतील असं होत नाही . ज्याला -त्याला त्याच्या केलेल्या अभ्यासाच्या मेहनती प्रमाणे गुण मिळतील. त्या गुणांच्या आधारावर आपण १ ला , २ रा , उत्तीर्ण आणि अनुउत्तीर्ण असं ठरवलं जातं . शिक्षण आणि व्यवहाराच्या दृष्टीने कदाचित हे योग्य असेलही पण त्या मिळालेल्या गुणांच्या आधारावर आपण त्या व्यक्तीबद्दल काही मत बनवणं मला चुकीचं वाटतं . तेच आयुष्याच्या बाबतीत १ ला , २ रा ..... उत्तीर्ण - अनुउत्तीर्ण , यश -अपयश अशी तुलना करणं मुळातच खूप चुकीचं वाटतं मला . आपल्याला जे हे सुंदर आयुष्य मिळालं ते आपण १ ला , २ रा ..... उत्तीर्ण - अनुउत्तीर्ण , यश -अपयश ह्या तुलना होऊच शकत नाही आणि आपल्याला तो अधिकारही नाही . बरेच लोक अपयशात खूप खचतात , नैराशेच्या गर्तेत वाहत जातात . अगदी टोकाचं पाऊल उचलून अगदी आपलं सुद्धा आयुष्य सुद्धा संपवतात . त्यासाठी त्यांची काही कारणं असतात ती त्यांना त्यावेळी योग्य वाटतात आणि ते कृती करून मोकळे होतात पण ह्यातून साध्य तर काही होतंच नाही. ( या विषयावर एका वेगळ्या लेखात सखोल मनोगत व्यक्त करेन मी)
आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात त्यात जर अपयश मिळालं तर कधीच खचून न जाता , स्वतःला सावरून खंबीरपणाने उभं राहायचं आणि जे काही आहे त्याचा धैर्याने सामना करायचा . अपयश मिळालं म्हणून आयुष्य संपत नाही म्हणून ते जे काही प्रयत्न केले त्या प्रयत्नांसाठी समाधान मानायचं .शेवटी प्रयत्नांती परमेश्वर !!!!!!!! म्हणूनच मी म्हणतोय ....... अपयशातलं समाधान ........................
सुनित कुलकर्णी
+91 94222 92820
.jpg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा